नितेश शेंडे | कोरपना प्रतिनिधी
बिबी : पहाटेच्या शांत वातावरणाला आज एका भीषण अपघाताने काळी किनार दिली. गावातील ६७ वर्षीय वृद्धाचा भरधाव ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण बिबी गाव हादरून गेले. या दुर्दैवी घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह रस्त्यावर ठेवत तब्बल तीन तास महामार्ग रोखून तीव्र आंदोलन केले. अखेर पोलिस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर मृतकाच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत जाहीर करण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, राजू सोयाम (वय ६७ वर्षे, रा. बिबी) हे आज पहाटे सुमारे ५ वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे मुख्य मार्गाने नैसर्गिक विधीसाठी जात होते. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (क्रमांक AP 05 TD 1034) त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की राजू सोयाम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला.
विशेष म्हणजे, अपघातावेळी ट्रकची नंबर प्लेट घटनास्थळी तुटून पडली होती. त्यावरून संबंधित ट्रक हा ‘केटीसी ट्रान्सपोर्ट’चा असल्याचे समोर आले. हा ट्रक अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडे सिमेंट भरण्यासाठी जात असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती गावात पोहोचताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे आणि अवजड वाहनांच्या बेदरकार वेगामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. मृतकाच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच संबंधित ट्रक चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्ता रोको आंदोलन सुरू केले.
या आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जवळपास तीन तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता पोलिस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची समजूत काढत ट्रान्सपोर्ट कंपनी आणि ट्रक मालकाशी चर्चा केली. अखेर मृतकाच्या कुटुंबाला तातडीने ३ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे मान्य करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले व वाहतूक सुरळीत करण्यात आली.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून, पुढील तपास ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात सुरू आहे. दरम्यान, सिमेंट कंपन्यांकडे ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांच्या भरधाव वेगामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा वाहनांवर नियंत्रण आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे।










