
गडचिरोली : एकीकडे रस्ते विकासाच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र अनेक मार्ग खड्डेमय झाल्याने वाहनचालक आणि नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. काकडयेली ते राजुली तसेच राधेश्याम बाबा मंदिर ते धानोरा या राष्ट्रीय मार्ग ९३० वरील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका निर्माण झाला आहे.
प्रवासाची ‘खड्डेमय’ कसरत
काकडयेली ते राजुली हा मार्ग आणि राधेश्याम बाबा मंदिर ते धानोरा हा राष्ट्रीय मार्ग ९३० हा परिसरातील वाहतुकीचा मुख्य कणा आहे. मात्र, सध्या या मार्गांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात हे खड्डे पाण्याने भरून जात असल्याने ते खोल आहेत की उथळ, याचा अंदाज घेणे वाहनचालकांना कठीण जात आहे. यामुळे दुचाकीस्वारांचे दुचाकीवरून पडून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.
वाहनधारकांमध्ये संताप
दैनंदिन प्रवासासाठी या मार्गाचा वापर करणाऱ्या शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्ग आणि सामान्य नागरिकांना दररोज मनस्ताप सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून, दुरुस्तीचा खर्चही वाढला आहे. “राष्ट्रीय मार्गाची अशी अवस्था असेल तर आम्ही दाद कोणाकडे मागायची?” असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा या मार्गांच्या दुरुस्तीची मागणी करूनही संबंधित विभागाकडून म्हणावे तसे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन तातडीने खड्डे बुजवावेत आणि रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. जर लवकरात लवकर या मार्गाचे काम झाले नाही, तर आंदोलन करण्याचा इशाराही काही संघटनांनी दिला आहे.









